इडा पिडा टळू दे,बळीचे राज्य पुन्हा येऊ दे

 ...........................

इडा पिडा टळू दे..बळीचे राज्य पुन्हा येऊ दे....


         आमच्या लहानपणीचा म्हणजे मी साधरणतः नऊ दहा वर्षांचा असेन, त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतोय. दिवाळीत 'बलिप्रतिपदा' हा दिवस । आम्ही सकाळी लवकर लवकर उठून अंघोळ करून दारासमोरील अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी कडू कारिट डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचो. आमचे बाबा सर्वांत अगोदर कारिट फोडायचे. त्यानंतर मग आम्हीही डाव्या पायाच्या अंगठ्याने सर्वशक्ती पणाला लावून कारिट फोडायची. माझ्या बालबुद्‌धीला या प्रथेबाबत अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. मी करिट फोडून झाल्यावर बाबांना विचारले "बाबा, बलिप्रतिपदे- दिवशी कारिट का फोडतात ? आणि ते कारिट डाव्या पायाच्या अंगठ्यानेच का फोडायचे?" माझ्या या प्रश्नाला बाबांनी उत्तर दिले. "आरं, याच दिवशी विष्णूने वामनाच्या रुपात येऊन डाव्या पायाच्या अंगठ्याने बळीराजाला ठार मारले: विष्णूच्या पराक्रमाची आठवण म्हणून आपण ही प्रथा करत आहोत." बाबांच्या या उत्तराने माझे समाधान झाले नाही. म्हणून मी बाबांना आणखी प्रश्न विचारले, " बाबा, बळीराजा खूप वाईट होता का? कडू कारिट, जे आपण कोणीही खात नाही, ते कारिट फोडून बळीराजाला आपण या दिवशी पुन्हा पुन्हा मारतो. इतका वाईट होता का तो?" यावर बाबा म्हणाले," नाही. बळीराजा शेतकऱ्यांचा राजा होता, तो आपल्या शिवाजीराजांसारखा होता." मी म्हटले, "मग का वामनाने त्याला मारले ? ""आरं, तो वचनात गावला होता. दिलं वचन पाळणं हा बळीचा धर्म होता. आणि देवाला दिलेले वचन पाळायला नको का? "बाबांच्या उत्तराने माझी प्रश्नावली थांबली असली तरी विचार करण्याची प्रक्रिया पुढे चालू राहिली.

       लहानपणी खूप भक्तिभावाने मी देवपूजा करायचो, पण अशा अनेक घटनांमुळे मला परिस्थितीने शंभर टक्के नास्तिक बनवले. देव चांगल्या माणसाला कसं काय मारतो? आणि चुकीची वचने कशी काय घेतो? हे माझ्या विवेकशील बुद्‌धीला पटणारे नव्हते, बळीराजाला कपटपणाने वामनाने का मरले ? याचे उत्तर आज मला मिळाले आहे. वैदिकांनी वामनाने बळीराजाला मारलेल्या वेद, उपनिषदे ब्राह्मण्यके या ग्रंथात अनेक कथा लिहून या घटनेचे समर्थन केले आहे. एवढेच नाही, तर विष्णूने केलेले कृत्य बरोबर होते, हे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे समाजमनावर बिंबवण्यास ते यशस्वी झाले आहेत. म्हणूनच आम्ही लहानपणी बळीराजाला कारिटरूपात मारत होतो, अशा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रथा असतील. मी सांगितलेली माझ्या स्वानुभवातील कथा ही अनेक प्रथांचे प्रतिनिधित्व करते.

      बळीराजाचा कालखंड:  

           सर्वसाधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी महाभारत घडले.आणि महाभारतात बळीराजाचे अनेक दाखले आले आहेत. कृष्णाचे वंशज आणि बळीराजाचे वंशज यांच्यात रोटी-बेटी व्यवहार झाला असल्याच्या नोंदी प्राचीन ग्रंथात आहेत. याचा अर्थ बळी राजाचा कालखंड हा कृष्णजन्मपूर्वीचा होता. अनेक वैदिक  ग्रंथात बळीराजाला आणि बळीवंशातील राजाना असूर,दैत्य असे संबोधले आहे. अगदी अश्मयुगापासून माणूस समूहाने राहत असे. या समूहातच त्यांचे रोटी-बेटी व्यवहार चालत असे. पुढे समूह-समूह संपर्कात आले. त्यांच्यातील संस्कृतींचे देवाण-घेवाण झाले. रोटी-बेटी व्यवहार झाले. हळूहळू हे समूह मोठे झाले. यांतील काही समूह म्हणजेच असूर, दैत्य, राक्षस (रक्षण करणारे), नाग होय. हे सर्व मूल भारतीय. त्यानंतर सूर भारतात आले. ते स्वतःला देव मानू लागले. आणि इतरांनाही देव मानण्यास भाग पाडले. आजही भारतीय समाज इंद्र, विष्णू, ब्रह्मदेव, नारायण, हरी, लक्ष्मी, सरस्वती, नारद, प्रजापती या सर्वाना देव मानतो. तसेच शंकर, कृष्ण, गणपती, खंडोबा, म्हसोबा ( महासुभा), जोतिबा, अंबाबाई, कालीमाता या असूर वंशीयांना पण लोक देव मानतात. असो.


         बळीवंशातील राजे हे असूरवंशीय होते. त्यांचे राज्य सप्तसिंधू प्रदेशात होते. सूरांच्या आक्रमणामुळे त्यांना हळूहळू  दक्षिणेकडे सरकावे लागले.

      

         बळीवंशातील पराक्रमी राजे:


      बळीवंशातील राजवटीत एकापेक्षा एक पराक्रमी राजे होते.कही विद्वान तत्त्वज्ञ झाले. त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ.

      बळीवंशातील राजांनी आपल्या आणि संपूर्ण बहुजन  समाजाच्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी युद्धे आणि संघर्ष केले. वैदिकांना यज्ञसंस्कृती, चातुर्वर्ण्यव्यवस्था आणि कर्मकांडे याद्वारे  बहुजन समाजाला आपल्या वर्चस्वाखाली आणायचे होते. म्हणूनच सूर संस्कृतीला असूर संस्कृतीने विरोध केला होता. आज असूर संस्कृतीतील लोकच (बहुजन समाज) सूरांच्या विजयाच्या कथा सांगून त्यांचाच टेंभा मिरवत असतील तर त्याहून दुदैव ते कोणते ? शंबर,जालंधर, नमुची, वृत्र हे बळी वंशातील महान पूर्वज आहेत. 

        

         हिरण्याक्ष हा सोन्यासारखी दृष्टी असणारा म्हणजे निर्मळ दृष्टीचा आणि पराक्रमी राजा आणि बहुजनांचा पूर्वज होय. तो आणि त्याचा भाऊ हिरण्यकशिपू यांनी सूरांशी खूप मोठा संघर्ष केला. आपल्या भेदभावविरहित समाजव्यवस्थेला सुरुंग लावण्याचे कार्य हे सूर लोक करत आहेत. त्यांचा आपल्या संस्कृतीत शिरकाव होऊ नये म्हणून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांनी मोठा संघर्ष केला. हिरण्यकशिपूचे सिंहासन सोन्याचे होते. कशिपू म्हणजे सिंहासन. छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच आदर्श घेऊन आपले सिंहासन सोन्याचे बणवले होते. शिवरायांना सुद्धा भेदभावविरहित राज्य स्थापन करायचे होते. पद्मपुराणात या दोघांची कथा आहे. हिरण्याक्षाला मारण्यासाठी विष्णूला दोन अवतार खर्च करावे लागले. विष्णू, इंद्र ही परंपरागत पीठ होती, इंद्र मेला की त्याचा मुलगा गादीवर बसायचा. तो राजा झाल्यावर त्यालाही इंद्र संबोधले जाई. वराह आणि कच्छप असे विष्णूचे दोन अवतार

 हिरण्याक्षाला मारण्यासाठी खर्ची पडले होते. हिरण्यकशिपू हा राजा तर सर्वश्रुत आणि सर्वपरिचित आहे. प्रल्हादाचा वडील म्हणजे हिरण्यकशिपू होय. प्रल्हाद कधीही नारायण भक्त नव्हता; पण त्याची नारायण भक्ताची कथा वैदिकांनी खोटीच रचून हिरण्यकशिपूला हीनठरवण्यासाठी आणि विष्णुच्या बाबतीत श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होण्यासाठी सर्व आटापिटा केला आहे. इंद्र किंवा विष्णुला विरोध केला तर त्याचे परिणाम वाईटच होतात हेच रुजवण्याचे कार्य वैदिकांनी पिढ्यान पिढ्या केले आहे. आजही 'भक्त प्रल्हाद आणि नारायणाचे (विष्णूचे) नरसिंहाच्या रूपातील जी खोटी कथा मिडियाच्या, नाटकाच्या आणि कथेच्या रूपात दाखवली जाते, ती वस्तुत: तशी नाही. नरसिंहाने हिरण्यकशिपूला ठार मारले.. कपटनीतीने नरसिंहाचे रूप पांघरून ठार मारले, हे सत्य आहे. शत्रूचा पाडाव करना करावा ? ही ज्याची-त्याची रणनीती असली तरी बहुजनांच्या हितासाठी चाललेल्या लोककल्याणकारी राज्याचा शेक्ट विष्णुमुळे झाला,असे समाजात होऊ नये म्हणून या खोट्या कथा घुसवून हिरण्यकशिपू किती दुष्ट होता, हेच पटवून दिले आहे. पुढे प्रल्हादालाही  विष्णूने ठार मारले. विष्णू सर्वव्यापी आहे.त्याच्या वाट्याला कोणी जाऊ नये, असाच प्रयत्न वैदिकांनी केला आहे

       प्रल्हाद असो, की त्याचे पिता हिरण्यकशिपू असो किंवा त्याचा पुत्र विरोचन असो, या सर्वांनी शिवाने (शंकराने) घालून दिलेल्या बहुजन हिताय तत्त्वांचाच अंगीकार केला. बळीवंशातील सर्वच राजे शिवाचे भक्त होते. प्रल्हादाला फितूर ठरवण्याचे

उद्योग वैदिकांनी केले, तो प्रल्हाद कधीच फितूर नव्हता. हा केवळ पुराणकारांचा स्वैर कल्पनाविलास आहे. नरसिंहाच्या माहात्म्यामुळे वैदिकांची (ब्राह्मणांची) वृद्धी झाली; तर बहुजनांचा र्‍हास झाला. प्रल्हाद हा यथार्थ दर्शनाचा प्रवर्तक होता, म्हणूनच विष्णूने त्याची हत्या केली. या हत्येचा उल्लेख पद्मपुराणात आला आहे. प्रल्हाद विष्णूच्या आहारी कधीच गेला नव्हता ;पण लोभी, कृत्रिमी, फितुरी, कपटी, घातकी, निर्दयी आणि क्रूर विष्णूने आपली यज्ञसंस्कृती आणि चातुर्वण्य व्यवस्था रुजवण्यासाठी त्यालाठार मारले, असे महात्मा फुले यांनी म्हटले आहे. 


        विरोचन आणि कपिलमुनी हे दोघे सख्खे भाऊ प्रल्हादाचे पुत्र होते. दोघांनीही इहवादी आणि जीवनवादी तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला. अदृश्य आत्म्याला किंवा आत्मा काल्पनिक संकल्पनेला त्यांनी कधीच स्वीकारले नाही. पुढे याच तत्त्वज्ञानाचा अंश चार्वाक, बुद्ध, जैन विचारसरणील रुमला गेला. कपिल मुनीनी मानवी जीवनाचे चार टप्पे पाडूनब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम अशा चार टप्प्यांची आदर्श 'आश्रमव्यवस्था' निर्माण केली. ही आश्रमव्यवस्था वैदिकांनी चोरून आपल्या नावे खपवली.  एवढेच नव्हे तर दैत्य म्हणजे निर्बुद्ध, क्रूर, अक्राळविक्राळ रूप असलेले, दुष्ट बुद्धीचे. असे बिंबवण्याचे काम सूरांनी म्हणजे ज्यांना तुम्ही देव मानता त्यांनी केले. स्वर्ग आणि नरक या वैदिकांच्या संकल्पनेला बळीवंशातील राज्यात तडा जात होता. म्हणूनच बळीवंशाचे सकल उच्चाटन करणे हे देवांचे ध्येय होते..

. विरोचन या महा योद्ध्याला शिवाच्या पत्नीची लालसा होती. म्हणून शिवाने विष्णुरूपात येऊन त्याला ठार मारले हेही खोटेच. उलट विरोचन हा शिवभक्त होता आणि पार्वतीने त्याला पुत्राचा दर्जा दिला होता, यज्ञ करणे, श्राद्ध घालणे त्यास नकार देणे म्हणजे असुरांप्रमाणे वागणे असे उपनिषदकारांनी म्हटले आहे, ते केवळ बहुजन समाजाला गुलाम बनवण्यासाठीच !


    एक सर्वश्रेष्ठ लोकहितवादी राजा - बळीराजा. .....

        बळीराजाची लोकप्रियता आजही भारतीय जनमाणसात टिकून आहे. बळी हा कृषिप्रधान राजा होता, म्हणून शेतकरी राजाला 'बळीराजा' असे संबोधले जाते. 'बळी तो कान पिळी' अशी म्हण महाराष्ट्रात सर्वत्र वापरली जात असली ,तरी बळी हा राजा बलवान जरूर होता; पण तो कुणावर अन्याय करणारा नव्हता. त्यामुळे या म्हणीचा बळीराजांशी काडीचाही संबंध नाही. 'बळीचा बकरा' ही म्हणही महाराष्ट्रात चांगलीच रुजली आहे. याशिवाय बळी दिला, बळी गेला, बळी पडला यांचा अप्रत्यक्ष बळीराजाशी कसा संबंध आहे आणि बळीराजाला वचनात पकडून कसा बळी दिला गेला. हेही आपण पाहणार आहोत. बळीराजा हा प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा मुलगा होय. बळीराजाच्या काळात सर्वत्र सुजलाम्-सुफलाम् होते. पुत्र, रयत सुखी होती. आपल्या राज्यात कोणीही दुःखी राहू नये, उपाशीपोटी राहू नये अशी बळीची विचारधारा होती. कुणाच्याही स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, यासाठीही बळीराजा आग्रही होता. प्रत्येकाला आपली संस्कृती जपण्याचा अधिकार आहे. या विचाराचा वैदिकांनी फायदा घेऊन हळूहळू आपल्या यज्ञसंस्कृतीचा चंचुप्रवेश बळीच्या राज्यात केला होता, हे सत्य असले तरी स्वतः बळीराजाने कधीही यज्ञसंस्कृतीचा  पुरस्कार केला नव्हता. बळीचे वाढते साम्राज्य, वाढती लोकप्रियता यामुळे विष्णू, इंद्र त्रस्त होते. ते बळीचा द्वेष करीत होते.बळीच्या साम्राज्याला तडा घालवण्यासाठीच बळीच्या राज्यात काही वैदिकांनी यज्ञसंस्कृती सुरु केली होती. बळीच्या वाढत्या साम्राज्याला रोखण्यासाठी म्हणे कृष्णाने आदितीच्या पोटी वामनाच्या रुपाने जन्म घेतल्याचे वामनपुराणात खोटी कथा सांगितली आहे. कृष्णाच्या लोकप्रियतेच्या फायदा घेण्यासाठी आणि एका आदर्श राजाला मारल्याचा ठपका आपल्यावर (वैदिकांवर) येऊ नये म्हणून हा खटाटोप केलेला दिसतो. वास्तविक कृष्ष्ण आणि वामन यांचा काडीचाही संबंध नाही. बळीने इंद्रादी राजांचा किती तरी वेळा मानहानीकारक पराभव केला होता. याचीच मळमळ इंद्र, विष्णू यांना होतो.. बळीच्या राज्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यज्ञात दिल्या जाणाऱ्या पशूच्या बळीला (हिंसेला) सक्त विरोध होता. वैदिकांच्या यज्ञात पशूला बळी देऊन त्याचे मांस भक्षण केले जाई. केवळ फूल अर्पण करून पूजा किंवा प्रार्थना करणे हा द्रविडी संस्कृतीचा पाया होता. माणूस मृत झाल्यावर त्याला फूल अर्पण करून नमस्कार करण्याची पद्धत ही मुळात द्रविडी संस्कृतीची; पण आज माणूस मृत झाल्यानंतर वैदिकांनी अनेक प्रथा निर्माण करून (माणूस मृत झाल्यावर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी, त्याचा आपल्याला काही त्रास होऊ नये अशी जनमाणसात भीती निर्माण करून) आपला फायदा करून घेतला. पशूला म्हणजेच गाय, बैल यांना बळीच्या राज्यात गोधन मानले जायचे. त्याची पूजा केली जायची. म्हणूनच पशूच्या हत्येला बळीच्या राज्यात विरोध होता. यज्ञासाठी वैदिकांना गोदान करण्यासही बळीचा विरोध होता. बळीच्या राज्यात ब्राह्मणांना यज्ञ करण्यास विरोध नव्हता; पण पशूच्या हत्येला विरोध होता. हेही एक शल्य वैदिकांना होते.म्हणूनच त्यांनी बळीचा पूर्ण पराभव झाल्यावर त्याला यूपाला (यज्ञात पशूला बांधण्यासाठी असलेला खांब) बांधून पशूसारखा बळी दिला.  वैदिक लोक (ब्राह्मण) तत्कालीन राजांना कधीच राजा मानत नव्हते. सोम हाच त्यांचा राजा होता. सोम म्हणजे यज्ञ. त्यामुळे इतर राजांचे नियम, कायदे आपल्याला लागू पडत नाही. त्यामुळे ब्राह्मणाने कितीही मोठी चूक केली तरी त्याला शिक्षा देण्याचा अधिकार राजाला नाही. राजाला ब्रह्महत्येचे पाप लागेल. हेच वैदिकांनी आपल्या ग्रंथात लिहून ठेवले आहे. वैदिकांच्या या विचारसरणीला छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर- -कुलकर्णीला अफजल- खानाच्या वधानंतर आपल्यावर चालून आल्यावर  जागीच ठार केले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी कट कारस्थानकरणाऱ्या अण्णाजी पंतादी मंडळींना मृत्यूदंड देऊन परंपरा पुढे चालवली होती. बळी हा ब्राह्मणद्वेष्टा होता. म्हणून त्याची हत्या झाली असे वैदिक परंपरा वारंवार सांगत आहे .याचे कारण बळीच्या हत्येबद्दल समाजाने आपला द्वेष न करता बळीच कसा चुकला हे समाजाच्या मनात बिंबवण्याचा खटाटोप आहे. बळी ब्राह्मणद्वेषी नव्हता, तर ब्राह्मण बहुजनद्वेषी होते, आहेत. अर्थात सगळ्यांनाच एकाच मापात मोजणे चुकीचे ठरेल. अनेक ब्राह्मणांनी ब्राह्मण्यवादाला विरोधच केला आहे.

श्रीमद्भागवतमध्ये बळी आणि वामनाची कथा आलीआहे. यांत बळीने आपल्या सामर्थ्याने मिळवलेले राज्य परत मिळवण्यासाठी विष्णूने वामनावतार (बटू) घेतला आणि बळीला वचनात पकडून त्याला ठार मारले. बळी हा जसा पराक्रमी होता, तसाच तो दानशूरही होता. दिला शब्द मोडत नव्हता . बळीकडे इतकी धनदौलत होती, की त्याने कितीही वाटली तरी संपत नव्हती. तो दारी आलेल्याला रित्या हाताने परत पाठवत नव्हता. याच बळीच्या गुणाचा फायदा घ्यायचा ,असे ठरवून मनात कपट ठेवून बटूने तीन पावले दान मागितले. काही ठिकाणी साडेतीन पावलांचा उल्लेख आहे. ही तीन पावले प्रतिकात्मक होती, हे वैदिकांनी आपल्या ग्रंथातून मान्य केले आहे. दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी वामनाला असे प्रतिकात्मक स्वरूपाचे दान देऊ नये म्हणून विरोध केला होता; पण बळीने दिले वचन मोडले नाही. बळी हा वचनाला जागणारा सत्वशील राजा होता, तो विष्णूसारखा

खोटारडा नव्हता. बळीबाबत पद्मपुराणात म्हटले आहे की,

'मी सत्याचा आश्रय घेऊन स्थिरावलेल्या दात्याला वाणीने,

विश्वासघाताने.कपट करून जिंकले.' नारायण म्हणतात. जे लोक ईश्वरावर , सत्यावर विश्वास ठेवतात, त्यालाच ईश्वर कपटाने कसा काय मारू शकतो? वामनाला संत कबीरांनी ईश्वर मानले नाही. महाभारतात भीष्माचार्यांनी सुद्धा बळीच्या गुणांचे कौतुक केले आहे.

वामनाने जी तीन पावले जमीन मागितली, ती बळीने घेण्यास सांगितले. वामनाच्या पहिल्या पावलाने सारी सृष्टी व्यापली. दुसऱ्या पावलाने पृथ्वीवरील सारे जल व्यापले. आता तिसरे पाऊल ? असे विचारल्यावर बळीने मस्तक पुढे केले आणि बटूने  त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला जमिनीत गाडले. विष्णूचे विशाल रूप हे केवळ पोकळ असून ब्राह्मणी महत्त्व वाढवण्यासाठी ही कथा रचली आहे. 

         वामनाला बळीने दिलेल्या तीन पावलाचा जो प्रतिकात्मक अर्थ आहे तो असा - वामनाने जमिनीवर पहिले पाऊल टाकले आणि या पावलाचा अर्थ बळीला सांगितला, "तू आम्हाला (वैदिकांना) तुझ्या राज्यात यज्ञ करण्यासाठी भूमी दे. याचा अर्थ यज्ञ करण्यास परवानगी दे! या पावलाने ब्राह्मणांना बळीच्या राज्यात कुठेही यज्ञ करण्याचा हक्क मिळाला. वामनाने दुसरे पाऊल टाकले आणि 'वेद हेच प्रामाण्य' मानण्याचे वचन घेतले. अर्थात वेदात चातुर्वण्य व्यवस्था आहे. वेद केवळ ब्राह्मणांच्याच हिताचा आहे. वेद‌प्रामाण्याने बहुजन समाज गुलाम बनणार होता आणि बळी राजाही! वामनाने तिसरे पाऊल टाकले आणि वैदिकांना वाणीचा हक्क  मिळवला. या वाणीच्या हक्कामुळे एखाद्या घटनेबाबत भाष्य करण्याचा ग्रंथ लिहिण्याचा, वाचनाचा हक्क वैदिकांना मिळाला. एकाधिकार मिळाला. इतके अधिकार मिळाल्यामुळे बळीने वैदिकांना इतके सारे अधिकार दिल्यामुळेच त्याने आपले साम्राज्य गमावले. त्याच्या राज्यातील अनेक लोकांना वैदिकांनी फितूर करून घेतले. बळीला गुलाम बनवले. बटूने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवतानात्याने डाव्या पायाने' बळीच्या मस्तकावर लाथ मारली. अर्थात हे लाथ तुच्छता दर्शवणारी आहे. 

      तामिळनाडूमध्ये कांचीपुरम येथे महाबलीचे प्रसिद्ध मंदिर आहे. पण या मंदिरात आज वामनाची मूर्ती बसवून 'वामन मंदिर करून टाकले आहे. येथे बटूने बळीला लाथ मारून उडवून दिल्याचे भव्य तैलचित्र आहे. बळीने दिलेल्या दानाचे हेच का फळ?

          महाराष्ट्रात महाबलेश्वर येथे 'महाबली 'मंदिर आहे. हे मंदिर आज भगवान शंकराच्या नावाने ओळखले जाते. बळी हा शिवाचा शिष्य होता, महाबली मंदिरावरूनच या ठिकाणाला महाबळेश्वर असे नाव पडले आहे. बळीचा पूर्ण पराभव झाल्यावर, त्याने सर्वस्व गमावल्यावर त्याला यूपाला बांधून पशूला बळी देतात तसे बळी देण्यात आले. या एवढ्या सर्व हालअपेष्टा बळीने' स्थित प्रज्ञासारख्या सहन केल्या, पण त्याने पश्चात्ताप केला नाही. मध्ययुगीन काळात छत्रपती संभाजी महाराजांनाही असेच हाल हाल करून मारले होते. बळीला यज्ञात पशूला मारतात तसे मारले. तेव्हापासून पशूला यज्ञात मारताना बळी देणे' असा वाक्प्रचार वापरण्यात आला असावा. याला निश्चितच आधार आहे.

     बळीराजाची व्यथारुपी कथा ऐकल्यावर वाचल्यावर मन सुन्न होते. हजारो वर्षे बळीराजाच्या कर्तृत्वाला आपण तिलांजली वाहिली आहे. दरवर्षी 'बलिप्रतिपदा' साजी साजरी करताना...'इडा-पिडा टळू दे बळीचे राज्य पुन्हा येऊ दे.' असे आपण म्हणत आलो आहोत. ते सत्यात उतरो हीच अपेक्षा आहे. 

   बळीराजाची कीर्ती दक्षिण भारतापर्यंत पसरली आहे. बलीचा गौरव करणारे मल्याळम भाषेतील पुढील गीत बोलके आहे. बळीराजाची लोकमाणसातील ही प्रतिमा पुसण्यास वैदिकांना अपयश आले आहे. 


      मावेली नाटु वाणीटुम कालम ।

मानुष रेल्लरू मोन्नूपोले.। कळ्ळवुमिल्ला चतियमिल्ला । एळ्ळोमिला पोळिवचनम् ।


अर्थ: जेव्हा मावेलि (महाबली) राजा राज्य करीत होता. तेव्हा सर्व माणसांना समान दर्जा होता. राज्यात कुठेही चोरी होत नव्हती, कपट नव्हते. लोक तिळाएवढेसुद्धा खोटे बोलत नव्हते. 

      दक्षिण भारतात बळीराजाला महाबलि असा उल्लेख केला जात असे. बळीराजाची पाळेमुळे समाजात खोलवर रुजलेली होती.त्याने राज्यकारभारासाठी विभाग पाडले होते. या विभागाचे काम पाहण्यासाठी एक प्रमुख नेमला होता. खंडोबा, जोतिबा, म्हसोबा (महासुभा) हे त्यातील काही सुभे होत. इंद्राने बळीला बुद्ध' असे संबोधले होते. 'मी बळीला बंधनात टाकून मारू शकत नाही' असे विधान इंद्राने केले होते.  

बलिप्रतिपदा या दिवशी बळीची वामनाने हत्या केली. त्याच्या पुनरागमनासाठी आपण हा दिवस साजरा करत आहोत. बळीराजा आणि बाळीपरंपरेतील अनेक राजांचा खरा इतिहास जनमाणसात पोचवण्यासाठी हा खटाटोप केला आहे. माझ्या परीने बळीराजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यांत काही त्रुटीही राहिल्या असतील. माझा हा लेख लोकांना, वाचकांना निश्चितच आवडेल, अशी आशा आहे

                     संभाजी पाटील

राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी,पंचायत समिती राधानगरी,9049870674

Comments

  1. *
    संपत गायकवाड, माजी साहाय्यक शिक्षण संचालक,यांची प्रतिक्रिया

    सर,बळी राजाचा लेख आज वाचला.पूर्वी बळी राजाबद्दल थोडं ऐकले/ वाचलं होतं.आ. ह. साळुंखे यांची पुस्तके पंधरा वीस वर्षांपूर्वी वाचली होती.*
    *सर,आ.ह.साळुंखे यांना फार मोठे विचारवंत समाज मानतो,पण तुमचं लेखन वाचले की वाटते तुम्ही आ.ह.साळुंखे पेक्षा परखड व वास्तववादी लेखन करता,तुमचे दोन्ही लेख त्याची प्रचिती देतात.*
    *समाजासमोर आपल्यातील विचारवंत समाजासमोर जाऊ दे.तुम्ही शिक्षक नसता तर समाजातील फारच मोठे विचारवंत झाला असता.आपण झाकलं माणिक आहात.आता आपले लेखन पुस्तक रुपाने समाजात येऊ दे.कर्मकांड करणारा, अंधश्रद्धा जोपासणारा, जुन्या रिती परंपरा हेच जगणं समजणाऱ्या समाजातील तरुणांसाठी आपले लेखन संजिवनी ठरेल हा विश्वास नाही तर ठाम विश्वास वाटतो.*
    *शिक्षक,राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक, लेखक यापेक्षाही आपण समाजाला दिशा देऊ शकणारे विचारवंत वाटता.*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

तुलसी विवाह-एक अनिष्ट प्रथा.

शर्ट पँट घातलेली मुलांची दुसरी आई

श्रीकृष्ण जन्माष्टमी